आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना
जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला.
गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य
साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या
प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय
सांगावे !
वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात
त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच
पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा.
गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या
दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत,
आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या
जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती
माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात
ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते
शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच
कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे
सद्गुरू.
अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण
अनुभवत असतो.
खरं पूजन, खरी गुरूपूजा
म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे.
त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास
करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या
नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य
ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.
गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे
आहेत. उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि
सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन
स्वामी व एकनाथ.
सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥
असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य,
साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून
गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो.
ह्याचेउदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून
घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.
हिंदु धर्मांत महर्षी व्यास आदय गुरु समजले
जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले
जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच कांही जण ह्या
गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात.
महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस
गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन,
आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या
मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा
निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु: साक्षात् परब्रह्म, तैस्मय:
श्री गुरुवे नमः॥
या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला
देवतुल्य दर्जा दिला आहे. हिंदु संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून
सामाजाला वाट दाखवली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्या शिवरायांनीरामदास
स्वामींना आपलं गुरु मानलं होतं. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची
प्रथा आहे.
ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या
शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार
पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं
गुरूंना केलेत नमन, त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती!
गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता
हवी.
प्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत
आली आहे. अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, आगरकर,
गांधी, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं
देता येतील. बुद्धधर्मींयामध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान
बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या
स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर
योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो. पण हल्ली अनेक जण योग्य गुरु न
मिळाल्याने बुवाबाजी, भोंदु यांच्या आहारी जातात.
माहिती संकलन: प्राची तुंगार